कोकणातील होळी म्हणजे केवळ रंगांची उधळण नव्हे, तर तो परंपरा, श्रद्धा, लोकसंस्कृती आणि सामूहिक एकोप्याचा भव्य उत्सव आहे. येथे ‘शिमगोत्सव’ या नावाने ओळखला जाणारा हा सण गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येक गावाची आणि वाडीची रीत वेगळी असली, तरी “वाईट शक्तींचा नाश होऊन गावात सुख-शांती नांदो,” हा भाव मात्र एकच असतो.
धार्मिक महत्त्व आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी
हिंदू संस्कृतीत होळीचा सण प्रह्लाद-हिरण्यकश्यपूच्या कथेशी जोडला जातो. भक्त प्रह्लादाच्या श्रद्धेचा विजय आणि होलिका दहन यामागील संदेश म्हणजे सत्य, श्रद्धा आणि सदाचाराचा विजय. कोकणात या धार्मिक आशयासोबतच लोकपरंपरा आणि ग्रामदैवतांच्या उपासनेची सुंदर सांगड घातलेली दिसते.
ग्रामदैवतांची पालखी आणि लोककलांचे दर्शन
शिमगोत्सवाच्या काळात गावातील देवतांची पालखी मिरवणूक काढली जाते. खांद्यावर पालखी घेऊन केलेले भक्तिमय नृत्य हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. यावेळी कापडखेळे, घुमटनृत्य, गोमू नृत्य आणि तमाशा यांसारख्या पारंपरिक लोककला सादर केल्या जातात. गावातील मांडावर देवतरंगासह होळी साजरी होते, ज्यात संपूर्ण गावकरी उत्साहाने सहभागी होतात.
उभी होळी आणि परंपरेतील विविधता
कोकणात होळी उभी करण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे. काही ठिकाणी माडाची, तर काही ठिकाणी सुपारी, सुरू किंवा आंब्याच्या झाडाची होळी उभी केली जाते. काही गावांमध्ये तीन झाडे एकत्र जोडून भव्य होळी उभारण्याची प्रथा आहे. ही उभी होळी म्हणजे गावाच्या सामाजिक एकात्मतेचे आणि एकोप्याचे प्रतीक मानली जाते.
कुणकेश्वरचा वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव आणि कापडखेळे
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे आंब्याचीच होळी उभी करण्याची खास परंपरा आहे. येथील उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दर तीन वर्षांनी साजरी होणारी ‘टिपवले’ अर्थात कापडखेळे नृत्याची परंपरा. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून निशाण काढले जाते आणि श्री देव कुणकेश्वर यांच्या आशीर्वादाने प्रत्येक घरात कापडखेळे साजरे केले जातात.
निशाण मिरवणूक आणि उत्सवाची सांगता
कुणकेश्वरमधील चार वाड्यांमध्ये हे निशाण चार दिवस फिरत असते. रंगपंचमीला कुणकेश्वर मंदिर ते महापुरुष स्थान असा मार्ग सडा-रांगोळीने आणि पायघड्यांनी सजवला जातो. या मार्गावरून पालखी महापुरुष स्थानापर्यंत जाते, तिथे टिपवले नृत्य सादर करून रंगांची उधळण केली जाते आणि वार्षिक उत्सवाची सांगता होते.
सामाजिक बांधिलकी आणि मुंबईकरांचा सहभाग
गाव रयतेच्या रक्षणासाठी प्रसाद म्हणून दिले जाणारे तीर्थ (व्हावन) गावातील मुंबईस्थित प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसे पोहोचेल, याची विशेष दक्षता घेतली जाते. ही परंपरा गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. कुणकेश्वरप्रमाणेच पुरळ आणि तिर्लोटमधील कापडखेळे देखील प्रसिद्ध आहेत.
कोकणच्या मातीतील जिवंत संस्कार
शिमगोत्सव हा केवळ सण नसून कोकणच्या मातीतील संस्कार, श्रद्धा आणि लोककलांचे दर्शन घडवणारा सोहळा आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा नाद आणि पालखीचे भक्तिमय वातावरण यामुळे या उत्सवाला वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. आजच्या आधुनिक युगातही या परंपरा जिवंत ठेवण्याचे सामर्थ्य कोकणच्या संस्कृतीत दिसून येते.

